खंडाळा तालुक्याच्या विकासाला मोठी गती; दळणवळण अधिक सुलभ होणार


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर 

खंडाळा तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भोर-अतीत-खंडाळा-लोणंद रस्त्याच्या रुंदीकरण व विकास प्रकल्पाला तब्बल ३३४  कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रजिमा-३ अंतर्गत कि.मी. ०/००० ते ४३/७५० या टप्प्याच्या कामास राज्य शासनाने हिरवा कंदील दिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत सुमारे ४३ किलोमीटर लांबीचा रस्ता १० मीटर रुंद करण्यात येणार असून, त्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे. पुणे, सातारा तसेच ग्रामीण भागाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गामुळे व्यापार, उद्योग, पर्यटन आणि शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेषतः खंडाळा तालुक्यातील नागरिकांना दैनंदिन प्रवासात होणारा वेळेचा अपव्यय कमी होणार असून, अपघातांचे प्रमाण घटण्यासही मदत होईल. या मार्गाच्या विकासामुळे परिसरातील आर्थिक घडामोडींना वेग मिळून स्थानिक विकासाला नवे बळ मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या विशेष प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजुरीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक नागरिक, व्यापारी व वाहनचालकांनी या निर्णयाचे स्वागत करत, काम लवकरात लवकर सुरू करून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
“भोर-अतीत-खंडाळा-लोणंद रस्ता प्रकल्पामुळे खंडाळा तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, हा प्रकल्प परिसराच्या आर्थिक प्रगतीचा महामार्ग ठरणार आहे.”


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!