निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
उडतरे ता.वाई येथील अथर्व संजय जाधव यांची भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) अंतर्गत प्यारा कमांडो म्हणून निवड झाली असून, त्यांनी वर्षभराचे अत्यंत खडतर व कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून ते नुकतेच गावी परतले होते.त्यावेळी उडतरे ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
देशाच्या सीमांच्या सुरक्षेसाठी विशेष कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरपणा आणि शिस्त यांची कसोटी पाहणारे हे प्रशिक्षण पूर्ण करणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे. अथर्व जाधव यांच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.अथर्व जाधव यांची ही यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कठोर मेहनत, चिकाटी आणि देशभक्तीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
प्रशिक्षणानंतर आता अथर्व संजय जाधव यांची अरुणाचल प्रदेश येथे पोस्टिंग झाली असून, ते देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावकऱ्यांच्या तर्फे आणि मित्रपरिवार यांच्या तर्फे अथर्व जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर,सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष कांतिलाल पवार,शिवाजीराव बाबर,संजय पवार,संजय जाधव,सुरेश पवार ,विष्णू बाबर,अनिल बाबर हे उपस्थित होते.
उडतरे येथे आज एकाच वेळी दिडशे ते दोनशे सैनिक सैन्य दलात देशसेवेसाठी असून 50 हुन अधिक पोलीस दलात कार्यररत आहेत,घराघरांत देशसेवेसाठी घडणारे तरुण आणि रोजच सराव करणारी युवा पिढी हीच खरी उडतरे गावाची श्रीमंती आहे आणि यातूनच उडतारे गावात अजून एक मानाचा तुरा रोवण्यात आलेला आहे.











