निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
सातारा जिल्ह्याने देशाला व राज्याला अनेक नेतृत्व दिलेली असल्याने हा जिल्हा रत्नांची खाण आहे. ब्रिटींशांनी आपल्यावर राज्य केले परंतु जोपर्यत त्यांनी मराठ्यांकडुन राज्य जिंकले नव्हते, तोपर्यत त्यांना भारतावर राज्य करता आलेले नव्हते, हा देखील इतिहास आहे. ब्रिटीशांना सातारा जिल्ह्यामध्ये काहीही करता आलेले नव्हते, क्रांतीची मशाल व धग या मातीमध्ये आहे व ती अजुनही असलेली दिसुन येते. किसन वीर आबांनी ज्या वाटेने मार्क्रमण करण्याचे सांगितलेले होते, त्याच वाटेने आज राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील चालत आहेत. सहकाराची मुहूर्तमेढ रोवणे आणि ते रूजविण्याचे काम कोणी केले असेल, तर ते किसन वीर आबांनी केले. त्यामुळे किसन वीरआबा हे सहकारातील मेरूमणी असल्याचे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले.
कारखान्याचे संस्थापक देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. म्हस्के बोलत होते. यावेळी चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, बाळासाहेब सोळसकर, राजेंद्र तांबे, प्रतापराव पवार, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
नामदार मकरंदआबा पाटील म्हणाले की, ब्रिटीशांच्या जोखंडातून देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरिता स्व. यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, किसन वीर आबा व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केलेले योगदान खुप मोलाचं आहे. त्याकाळात महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांमध्ये अग्रभागी होता. या सर्वाना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता आपल्या प्रपंचाकडेही दुर्लक्ष करून भुमिगत राहुन ब्रिटीशांना लढा दिलेला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्वराज्याचे सुराज्य करण्यामध्ये किसन वीरआबांचा मोठा वाटा होता. यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याचे काम त्यांनी केले. किसन वीरआबांनीदेखील त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला पुढे नेहण्याचे काम केले. किसन वीरआबांच्या दुरदृष्टीतुनच हा कारखाना उभा राहिला, जेणेकरून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन व्हावे, रोजगार निर्मिती व्हावी, तरूणांच्या हाताला काम मिळावे. तसेच धोम धरणाची निर्मिती करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणले,जनता शिक्षण संस्थेचे उभारणी करून शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध केली. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबतता मिळाली पाहिजे, ही भूमिका आबांची होती. या जिल्हयाचे राजकारण किसन वीरआबांच्या भोवतीच फिरायचे. जिल्हयामध्ये अनेक नेते घडविण्यामागे किसन वीरआबांचाच हात होता. आबांनी केलेली कामे ही दिशादर्शकच होती. आबांनी दाखविलेल्या मार्गावरच स्व. लक्ष्मणराव तात्यांनी मार्गक्रमण केले, आणि आम्ही देखील त्याच मार्गाने जात असल्याचे सांगून संस्था ताब्यात घेण्याचे कारणही तेच होते, ज्यांनी या संस्थेसाठी आपला जीव ओवाळून टाकला, ती संस्था अडचणीत असताना शेतकरी व कामगारांच्या हितासाठी ताब्यात घेतली व ती आम्ही पुर्नजिवित करण्याचा प्रयत्न करीत असून त्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे. मागील चार सिझन आम्ही शेतकऱ्यांचा एकही रूपया थकविलेला नाही. किसन वीर कारखाना हा शेतकरी व कामगारांना न्याय देण्यासाठी ताब्यात घेतलेला होता आणि तो न्याय आम्ही देत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही नामदार पाटील यांनी सांगितले.
प्रमोद शिंदे म्हणाले की, किसन वीर आबांनी अनेक कार्यकर्तें घडविण्याचे काम केलेले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. ज्या हेतुने प्रेरित होऊन किसन वीरआबांनी हा कारखाना उभारलेला होता, तोच हेतु मनामध्ये ठेऊन नामदार मकरंदआबाच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ चालत आहे. कारखान्याबाबत काही अपप्रवृत्ती विष प्रेरण्याचा प्रयत्न करीत असून सुज्ञ सभासद याला भीक घालणार नाहीत, याची खात्री आम्हाला असुन येणाऱ्या सिझनमध्ये आपण पिकविलेला संपुर्ण ऊस किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्यालाच घालण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरूवात किसन वीर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले, कार्यक्रमास बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, रामदास इथापे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक उत्तम पाटील, पंचायत समितीचे सभापती भैय्यासाहेब डोंगरे, मार्केंट कमिटीचे सभापती मोहनराव जाधव, रमेश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, खंडाळा पंचायत समिती उपसभापती संतोष वीर,बबनराव साबळे, स्वप्निल शिंदे, कांतीलाल पवार, शशिकांत पवार,संभाजीराव धुमाळ, कुमार बाबर, अनिल जगताप, महादेव मसकर, ॲड. उदयराव पिसाळ, विक्रम पिसाळ, विक्रम वाघ, अरविंद कुदळे,अरविंद कदम, लक्ष्मणराव पिसाळ, विलास येवले, शैलश सपकाळ, शंकरराव शिंदे, सुर्यकांत बर्गे, गजानन जाधव, सुधीर गायकवाड, चंद्रकांत ढमाळ,शिवाजीराव शेळके, बापूसाहेब सावंत, राजेंद्र सोनावणे, सत्यजित वीर, आत्माराम सोनावणे, प्रा. शामराव शिंदे, संपतराव वाघ,कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते










